गुरुवार, २३ सप्टेंबर, २०१०

चांदणरात...!!

४ वर्षांपूर्वी University ची entrance exam देताना सुचलेली कविता... तेव्हाच, त्याच hall ticket वर लिहून काढलेली.... (परीक्षेचा निकाल काय लागला ते सुज्ञास सांगणे न लगे.... ;) ) 

चांदणरात.... तुझी चांदणसय,
जणू गारव्यात, मारव्याची साधलेली लय...!!!
चांदणरात.... रातराणीचा गंध,
तुझ्या आठवणींचा डवरला निशिगंध...!!!
चांदणरात.... स्वप्नाळली निद्रा,
हातांच्या आरशात, तुझीच मुद्रा...!!!
चांदणरात.... तुझी आठवण,
जणू माझिया ओंजळीत ता-यांची साठवण...!!!
चांदणरात.... विरला सारा शीण,
चांदण्याच्या स्पर्शाने उसवलेली वीण...!!!
चांदणरात.... पहाटेवर लवंडलेली,
शुक्राची चांदणी क्षितिजावर कलंडलेली...!!!
अशी चांदणरात.... अशी तुझी चांदणसय....
जीवाला वेड लागेल नाहीतर काय??? 
-स्वाती....

तो.....

तो प्रत्येकीच्या जीवनात असतोच या ना त्या रूपाने...
कधी वळवाचा पाऊस असतो, कधी स्वप्नांची कूस असतो...
कधी भावनांचा पूर असतो, कधी सप्तकातला सूर असतो...
कधी कातर संधिप्रकाश असतो, कधी तिला सादवणार निळभोर आभाळ असतो...
कधी जमलेल्या कवितेची मैफिल असतो, कधी नुकतीच जन्मलेली गजल असतो...
कधी आयुष्याचा संगीत तो असतो, तिने गायलेलं प्रत्येक गीत तो असतो...
ती त्याची सावली तर तिची काया तो असतो, तिने उभारलेल्या घरकुलाचा पाया तो असतो...
झंकारला तर षडज, छेडला तर साज असतो...
तिचा मित्र, तिचा सखा, तिच्या सादेला मिळणारा प्रतिसाद असतो...
तो असतो नागमोडी धावणा-या रस्त्यामध्ये, तो असतो बेभान घोंगावणा-या वा-यामध्ये...
तिच्या स्वप्नात जागणारा तो असतो, तोच असतो रात्रीला सोबत करणा-या ता-यांमध्ये...
ती जितकी व्यापक, तितकाच अथांग तो असतो...
सूर्याची दहाकातही त्याच्यामध्ये, अन पौर्णिमेचा चंद्र शांतही तो असतो...
तो असतो इतका अंतर्भूत, कि त्याचा असणं नाकारता येत नाही...
त्याचं अथांग अस्तित्व तिला स्वीकारू म्हणता, स्वीकारता येत नाही...
स्वीकारलं किंवा नाकारलं तरी, प्रत्येकीजवळ तो असतो जपलेल्या श्वासासारखा...
ती एकदातरी अनुभवतेच त्याला, तो असतो एका आभासासारखा!!!!!
..... कारण प्रत्येकीच्या आयुष्यात असतोच "तो" या ना त्या रूपाने!!!!
-स्वाती...... 

मंगळवार, २१ सप्टेंबर, २०१०

रात हमारी तो.....!!

सांजावून आलंय बाहेर!! कातरवेळ उभी उंब-याशी!! तुझ्या येण्याची अनामिक चाहूल मनात... पण का हुरहुरतंय माझं मन, जरी ठाऊक आहे तुझं येणं निश्चित आहे!! जशी गेलीस भल्या पहाटे मला दूर लोटून, तशी येशील नक्कीच मुक्या मनाचं काहूर घेऊन...!!! तुझ्याच आसपास रेंगाळत राहिलंय माझं मन त्या क्षणापासून! तुझ्या सानिध्यात का इतका शांत, शांत वाटावं? आयुष्यातले सगळे प्रश्न, सगळी उत्तरं, सगळ्या विवंचना का दूर कुठेतरी लोटल्या जाव्यात? तू नसताना पूर्ण वेळ एका दृश्य जगात डोळसपणे वावरणारी मी, तुझ्या सानिध्यात का अचानक एका अज्ञाताच्या वेडाने पछाडली जावी? जे जे हवं असतं माझं जगणं समृद्ध करण्यासाठी ते ते तुझ्याजवळ असताना का लाभावं? नाही सापडत या प्रश्नांची उत्तरं!!! अजून बेचैन होऊन जाते मी.. वेड्यासारखी पडताळत राहते माझ्याच जाणीवा, ज्या तुझ्या येण्याने माझी साथ सोडून जातात.. पुन्हा एकदा तुझ्याजवळ येण्याची आस लावून जातात!!

तुझ्याजवळ इतकं मुक्त, इतकं शांत का वाटावं?? कारण तुझ्यासोबत मी "मी" असते. सतत बाळगलेला एकेक मुखवटा गळून पडतो तुझ्यासमोर. माझे अश्रू सावरणारी असतेस तू.. मला कुशीत घेणारी, माझ्यातले "मी"पण जपणारी!! कुठलेही पूर्वसंकेत, पूर्वग्रह, अभिनिवेश न ठेवता स्वीकारतेस तू "मला"!! माझे लाड करतेस.. माझ्याशी "मी" होऊन संवाद साधतेस.. माझ्या थकलेल्या मनाला शांत करतेस.. हळुवारपणे तुझ्या कोशात घेतेस माझ्या श्रांत मनाला.. सगळे व्याप, सगळे ताप हळूहळू विरत जातात.. दूर क्षितिजाकडे पाहताना केव्हा तुझ्या अस्तित्वाचा अंमल माझ्यावर चढतो ते कळत नाही!!!

आणि मग खोलवर दाटलेल्या उर्मी अनावर होतात. आतवर काहीतरी हेलावतं.. माझ्या मिटलेल्या डोळ्यांतून दोन थेंब झरतात तुझ्या कुशीत!! तेव्हाच प्रेमाने जागवत असतेस माझ्या निद्रिस्त मनातील काही भावना.. "हे कसं शक्य आहे??" म्हणून मी हलकेच मागे सारलेल्या शक्या-शक्यता माझ्यासमोर उलगडून दाखवतेस.. अगदी माझ्या हाताच्या अंतरावर!! 'हात पुढे केलास तर सगळं आहे आवाक्यात तुझ्या!' ठामपणे सांगतेस मला!! आणि तेव्हाच हलकेच तुझा पदर आणखी ओढतेस माझ्या डोळ्यांवर!! सगळं स्पष्ट दिसायला लागतं मला!! आणि मी विरघळत जाते त्या "माझ्या' जगात!!! पिसासारखी हलकी होऊन.. सगळ्या जाणिवांच्या पार, वेदनांच्या पार.. घेऊन जातेस मला!!

कधी आईची कूस होतेस, बाबांचा ठाम आधार होतेस, बहिणीचा आश्वासक स्पर्श होतेस, प्रियकराची बेभान मिठी होतेस, सखीचा प्रेमळ खांदा होतेस तर कधी हळूच माझ्यातले "मी"पण तोलून धरणा-या कृष्णसख्याची करंगळी होतेस!! अश्या असंख्य रुपात मला रोज भेटतेस.. माझी होऊन... माझ्यासाठी!! सगळ्या-सगळ्या भावनांना मोकळी वाट करून देतेस!! कधी अश्रू, कधी स्वप्नं.. क्षणभंगुर का होईना पण त्या क्षणांसाठी मला "माझी" करून जातेस!! एक विश्वास जागवतेस, एक उमेद जागवतेस!! तुझ्या कुशीत एका नवीन आशेने हसणा-या मला हलकेच माझ्याच हातात सोपवून निघून जातेस.. पण तुझ्या मैफिलीत रमलेल्या मला ते कधीच कळत नाही!!

कारण.... तुझ्या भैरवीत रमलेल्या माझ्यासाठी एका हळुवार भूपाळीची नांदी करून जातेस..........

स्वाती....

मंगळवार, ७ सप्टेंबर, २०१०

एक प्रवास... "माझ्या"पासून "आपल्या"पर्यंत!!!

मध्यंतरी फेसबुकवर माझे आणि माझ्या बहिण भावंडांचे जुने फोटो टाकत असताना अचानक एक गोष्ट लक्षात आली... कि माझे जितके "भरपूर" फोटो आहेत लहानपणीचे तितके "तिचे" नाहीत... अगदी सिलेक्टेड काही!! पण त्यातसुद्धा बाहुलीसारखी दिसणारी ती!! आणि मी अचानक flashback मध्ये गेले........

लहानपणी सगळं कसं माझ्या अवती भवती फिरणारं होतं!! मी केलेल्या प्रत्येक, एवढुश्या गोष्टीचं सुद्धा अगदी अख्ख्या चाळीला कौतुक असायचं!! आई, पप्पा, दादा, ताई, काका, काकू अगदी समोरच्या घरात राहणारे आजोबासुद्धा!! सगळ्यांचा लाडोबा असलेल्या मला तेव्हा फक्त मी आणि माझंच माहित होतं!! माझी आई, माझे पप्पा, माझी खेळणी एवढंच काय अगदी माझं घरसुद्धा!! माझ्यासाठी सगळ्या गोष्टी आवर्जून आणल्या जायच्या. "हा फ्रॉक गुड्डीला छान दिसेल नै??", "सगळं कसं घडा घडा म्हणून दाखवते....", "सतीशची पोरगी बाकी हुशार आहे हो..." या आणि अश्या असंख्य बालसुलभ कौतुकाची मला इतकी सवय झाली होती. माझे सगळे हट्ट पुरवले जायचे!! (म्हणजे तसे ते आत्ताही पुरवले जातातच पण तेव्हा "फक्त" माझेच हट्ट पुरवले जायचे...) पप्पांच्या गाडीवर बसायचा मान माझ्या "एकटीचा" असायचा!! उटी, मद्रास, तिरुपती अश्या सगळ्या सहलींना आई पप्पांसोबत फक्त मलाच जायला मिळायचं!! दादा, ताई लोकांना टुकटुक करून... मग तिथून आलं की सगळ्या फोटोत मी आणि मीच!!!!!

आणि असं सगळं सुरळीत चालू असताना अचानक एके दिवशी आईला दवाखान्यात घेऊन गेले. "आई आता गुड्डीसाठी छान छान दादा आणणार खेळायला!!" माझ्या काकूने माझ्या कानात सांगितलं!! "दादा आणणार म्हणजे कुठून आणणार???, त्याला आपल्याकडेच का यायचंय?? आपण ज्यांच्याकडून दादाला आणणार ते काय करतील मग?? त्यांना दादा कुठला???" या प्रश्नोपनिशदाची जरादेखील दखल न घेता घरातले सगळेजण नवीन पाहुण्याच्या स्वागताच्या तयारीला लागले... इथेच माझ्या "एकछत्री" साम्राज्याला सुरुंग लागायला सुरुवात झाली. 

आणि मग एके दिवशी दवाखान्यातून बातमी आली... "मुलगी झाली!!" म्हणून.... काकू, आत्या, आजी सगळेजण दवाखान्यात गेले.... त्यानंतर धावपळ सुरु झाली... "यावेळी तरी मुलगा हवा होता ग!!" असं म्हणणा-या बायका आमच्या घरी येऊ लागल्या.. मला मात्र कुणीच दवाखान्यात चल असं म्हणालं नाही... :( "दादा येणार म्हणाली होती काकू, मग मुलगी कशी काय??" हा मला पडलेला प्रश्न कुणालाच विचारता येत नव्हता!! "पण मी असताना अजून एक मुलगी कशाला हवी?? आपण आईला भेटलो कि तिला सांगू आपण हि मुलगी देऊन एक दादा घेऊयात असं!!" हे माझा मनातल्या मनात ठरलं पण!! पण मला आईला भेटायला कधी घेऊन जाणार?? आता घरात असलेले सगळेजण फक्त नवीन बाळाबद्दलच बोलायचे. ती कशी गोरी पान आहे, कशी गोड दिसते... सारखं आपलं तेच कौतुक!! 

मग शेवटी एकदा काकू मला घेऊन दवाखान्यात निघाली.. संपूर्ण रस्ताभर नुसत्या सूचना!! "बाळाला लगेच हातात घ्यायचं नाही, हात पाय धुवायचे, आईजवळ जास्त वेळ बसायचा हट्ट करायचा नाही, तिथे आरडा ओरडा, पळापळ करायची नाही!!!" मी इतक्या सूचना ऐकूनच दमून गेले होते. "काय त्या बाळाला इतकं जपायचं?? आणि म्हणे आईजवळ जायचं नाही.. माझ्या आईजवळ मी जायचं नाही.... :(" या विचारानेपण रडू फुटलं मला. मग काकू म्हणाली होती, "अगं ती तुझी बहिण आहे न.... मग आता तिला तूच जपायचं!!" 

सारसबागेजवळच्या दवाखान्यात एका खोलीत नेलं मला! तिथे एका कॉटवर आई बसली होती आणि तिच्या शेजारी आजी. माझी आई किती आजारी दिसत होती... तिला खूप सारी इंजेक्शन लावली होती... मला त्या बाळाचा इतका राग आला!! मग आईने हळूच मला जवळ बोलावलं आणि तिच्याजवळ दुपट्यात गुंडाळून ठेवलेलं छोटुस बाळ दाखवलं!! "हि तुझी छोटी बहिण!!" असं सांगून आईने हळूच माझा हात हातात घेतला आणि त्या बाळाच्या गालाला लावला... :) इतकं गोड, इतकं मऊ मऊ!!! त्यावेळी माझ्या डोळ्यात पाणी आलं का?? माझ्या मनात अजून काय काय आलं?? हे नाही आठवत पण त्या क्षणानंतर मी त्या बाळाला, नाही नाही, माझ्या बहिणीला स्वत:पासून कधीच लांब नाही केलं!!! 

हे सगळं मी अनुभवलं तेव्हा मी ४ वर्षांची होते!!! (कदाचित हि आणि अशीच वाक्य नसतील तेव्हा माझ्या मनात पण एक मात्र नक्की भावना हीच होती.... :) ) त्यानंतर मी किती तरी वेळ रडत होते... कारण मला तिला हातात घ्यायचं होतं आणि मोठे कुणी मला तिला हात पण लावू देत नव्हते. पण शेवटी कुणालातरी माझी दया आली असावी... त्यांनी तिला माझ्या हातात दिलं आणि मी खात्रीपूर्वक सांगू शकते.. त्याक्षणी मला वाटलं कि मी जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट माझ्या हातात घेतली आहे!!! "माझी बहिण!!" :)

अचानक मी "ताई" झाल्याचा साक्षात्कार झाला सगळ्यांना!! (मलासुद्धा!!) आणि मग तिचं मोठं होणं, पालथं पडणं, रांगायला लागणं, बोलायला लागणं या सगळ्या सगळ्या गोष्टींचा माझ्यासाठी सोहळा झाला. नाही म्हणायला तिचा राग पण खूप यायचा जेव्हा तिच्याकडे लक्ष नाही दिलं म्हणून मला मार बसायचा आईचा तेव्हा!! पण नंतर शाळेतून आल्यावर हसणारी, खेळणारी ती बघून मी परत तिच्याजवळ जाऊन खेळायला लागायचे. शाळेतसुद्धा तिच्या सगळ्या गमती-जमती सांगताना आणि "माझी छोटी बहिण आहे न" असं म्हणताना मी खूप मोठी झाल्यासारखं वाटायचं!! चालायला लागल्यावर ती पडली कि मी तिच्याजवळ जाऊन जमिनीला "हात ग!! आमच्या टीनुला मारते" असं करून जमिनीला मारलं कि टाळ्या पिटून हसायला लागायची ती!! तिचं ते निरागस हसणं आणि माझ्यावरचा तिचा विश्वास यासाठी मी आजदेखील जाऊन जमिनीला "हात ग!!" करायला तयार आहे. :)

आम्ही शाळेत जायला लागलो आणि लुटुपुटूची भांडणं तक्रारींमध्ये बदलली. माझ्याजवळ असलेली वस्तू तिला हवी असायची. मग आरडा ओरडा, मारामारी, वाद विवाद!! "मला शाळेत सगळेजण ताईची बहिण म्हणून ओळखतात :(" रडवेला चेहरा करून केलेली ही तिची तक्रार मला सुखावून जायची. :) सोसायटीमध्ये खेळताना माझ्याच टीममध्ये येण्यासाठी रडणारी ती, माझं कुणाशी भांडण झालं की "मला पण नाही खेळायचं त्यांच्यात" असं म्हणून माझ्या मागे घरी निघून येणारी ती, आई पप्पा मला ओरडले की मला शांतपणे माझी चूक समजावून सांगताना माझ्यापेक्षा लहान असूनही माझी "ताई" होणारी ती, शाळा-कॉलेजमध्ये घडणा-या रोजच्या घटना अगदी इत्थंभूत वर्णन करून सांगणारी ती.. माझ्या अनुभव विश्वाला प्रत्येक क्षणी समृद्ध करत गेली.

आज मागे वळून पाहिलं की जाणवतं.. किती काही शेअर केलं तिच्याशी!!! अगदी कॉलेजमधल्या मूर्ख भांडणापासून ते माझ्या प्रेमातल्या हळव्या क्षणांपर्यंत!!! त्याने मला लग्नासाठी विचारलं तेव्हा सगळ्यात  आधी विश्वासात घेऊन तिलाच तर सगळं सांगितलं मी!! आणि तिने ते समजून घेतलं... आणि असं समजून घेतानाही तिच्यातली एक लहान, निरागस मुलगी सतत जपली.. ऑफिसच्या वैतागातून घरी आलं की "ताई.." म्हणून दार उघडणारी ती पाहीली की सगळा वैताग निघून जातो आणि पुढच्याच क्षणी वादाला सुरुवात होते ही गोष्ट वेगळी.. :)

खूप खूप काही सांगता येईल तिच्याबद्दल.. तिच्यासाठी!!! पण सध्या फक्त एवढंच!! हे जमलंय की नाही माहित नाही... सगळ्यांना आवडेल की नाही माहित नाही... पण तिला नक्की कळेल, आवडेल.... या हृदयीचे, त्या हृदयी घालण्याचा हा एक प्रयत्न!!! :)

"माझ्या"पासून सुरु झालेला हा प्रवास "आमचा" होऊन राहिला आहे!!!! :) त्यादिवशी मानेखाली हळुवार आधार देऊन हातात धरलेली ती बाहुली आता माझ्या भावविश्वाचा आधार बनून राहिली आहे.... :)

-स्वाती....

बुधवार, २५ ऑगस्ट, २०१०

आठवणी म्हणतात तुझी खूप आठवण येते!!!

आठवणी म्हणतात तुझी खूप आठवण येते!!!
तुझ्या आठवणींमध्येच पहाटेची दुपार,
निसटती कातरवेळ मग चांदण्याची रात्र होते....
आठवणींच्या सगळ्याच चांदण्या रात्रभर बोलत राहतात...
तुझ्या विषयामध्ये रमून जातात...
खूप हसतात,तुला आठवत आठवतच नकळत मग त्या विझतात...
पण विझण्याआधी तुझ्या आठवणींचा हात अलगद पहाटेच्या हातात देऊन जातात...
मी केव्हाच माझ्या हातातून तुझ्या आठवणींचा हात सोडत नाही....
त्या सतत माझ्यासोबत चालत असतात...चालत  असतात...!!!!

गुरुवार, १० जून, २०१०

कट्टा....!!!

आत्ता नक्की दिवस कोणता होता, वेळ कोणती होती ते आठवत नाही.... पण २००३ सालातली कुठली तरी एक दुपारची चांदण्याची वेळ होती एवढं आठवतय.. जेव्हा माझी पहिल्यांदा त्याच्याशी ओळख झाली. स्थळ:फर्ग्युसन कॉलेज, पुणे-२. दादासोबत BCS चा फॉर्म भरण्यासाठी मी चालले होते. कॉलेजच्या गेट मधून आत गेल्या गेल्या समोर एक सुंदर बिल्डींग (अगदी जुन्या सिनेमात खपून जाईल अशी...) त्यासमोर एक सुंदर सर्कल (त्यात कारंज्यासारख काहीतरी दिसत होतं...) आणि त्या सर्कलच्या जवळच असलेला "तो"!!! बापरे त्याचं पहिलं रूप पाहूनच घाबरले होते मी.... त्याच्या आसपास जमलेली मुलं-मुली आणि त्यांच्या एकेक त-हा पाहून आपल्याला नाही बा यायचं इथे... असा मी मनातल्या मनात ठरवलं!!! पण हे दादाला कसं काय कळलं कुणास ठाऊक?? मला हळूच म्हणाला तो, "गुड्डी याचा तुझ्याशी जास्त संबंध येणार नाहीये!! हे नुसतं वरवरचं आहे.. खरं FC याहून खूपच वेगळं आहे..." आणि मी शांतपणे दादाच्या मागून चालू पडले... खरंतर त्याला पाहून एक क्षण भीती वाटली हे खरंय पण मी थोडीशी हुरळले पण होते... भीती वाटण्याचं कारण म्हणजे त्याच्याजवळ बसलेला तो ग्रूप... बर्मुडा घातलेली, झिप-या वाढवलेली, काळे काळे टी शर्ट घातलेली आणि हातात गिटार घेऊन काहीतरी अगम्य भाषेत गाणारी मुले, त्यांच्या त्या बर्मुडा पण  मोठ्या वाटतील एवढे लहान स्कर्ट घातलेल्या २ मुली... अरे ही असली गर्दी आहे या कॉलेजमध्ये...(हो, गर्दीच!! कारण तेव्हा Croud या शब्दाचा परिचय व्हायचा होता... आणि ज्या ग्रूपला पाहून मला भीती वाटली होती... तो नुसता Croud नाही तर तिथला coolest आणि happening croud होता हे अगाध ज्ञान मज अडाण्याला कुठून बरं असणार?? जाऊ दे बरच पाल्हाळ लागतंय!!) तर मी काय सांगत होते, "माझा, हडपसरसारख्या लहान जागेतून आलेल्या मुलीचा इथे काय निभाव लागणार???" अशी भीती वाटत असतानाच, "तो" जणू मला मिश्किलपणे म्हणत होता की "इथे आल्यावर माझ्यापासून लांब राहणं मुश्कील ही नही, नामुमकीन है!!!" आणि मी त्याच्याकडे पहात पहात दादाच्या मागून चालले होते. 

शेवटी "मिळणार की नाही, मिळणार की नाही" या धाकधुकीमधून बाहेर येऊन मला FC ला प्रवेश मिळाला. पहिल्याच दिवशी, एका अनोळखी जगात, एका खूप भार्री कॉलेजमध्ये (हे मत तेव्हापासून आहे माझं... की FC इतकं भार्री कॉलेजच नाहीये...) मी जवळजवळ भांबावलेल्या अवस्थेत उभी असताना एक मुलगी माझ्याजवळ आली आणि म्हणाली "इथे Computer Science चं department कुठेय??" आली का पंचाईत?? अब एक अंधा दुसरे अंधे की क्या मदद करेगा?? पण तरी मी तिला नेटाने "चल मी पण तेच शोधतेय" असं म्हणाले. आणि आम्ही दोघींनी त्या department चा शोध लावला... (कोलंबसला अमेरिका शोधल्यावर काय आनंद झाला असेल असा आनंद मला ते department, त्या department मधला माझा वर्ग आणि त्या वर्गातली माझ्यासारखीच येडी दिसणारी पोरं-पोरी पाहून झाला.... :)) चला, आपल्यासारखेच अजून भरपूर जण आहेत... हा दिलासा मिळाल्यावर एकेकाशी बोलणे, ओळखी करून घ्यायला सुरुवात करणे अश्या धामधुमीत पहिला दिवस संपला... घरी जाताना परत त्याच ठिकाणी "तो" दिसला.. एकटाच!! "अरे आज इथे कोणी नाही वाटतं. नाहीतर सारखं इथे अख्ख्या FC मधली टपोरी लोक पडीक असतात.." ती माझी नवी मैत्रीण वय वर्षे एक दिवस सांगत होती. (हे वय तिचं नसून आमच्या मैत्रीचं आहे. सुज्ञास सांगणे न लगे) हे ऐकून त्याच्याबद्दलची भीती जाऊन आता तिथे हळूहळू तिरस्कार यायला लागला होता... 


दुस-या दिवशी कॉलेजमध्ये जायच्या आधी एका नवीन मित्राशी ओळख झाली.. आदित्य... तो माझ्या मावशीच्या शेजारीच राहणारा होता आणि माझ्याच वर्गात होता... त्यादिवशी कॉलेजमध्ये गेल्या क्षणी समोर दिसलेलं दृश्य पाहून मला धक्काच बसला. "अरे हा आदित्य टपोरी आहे?? घरी तर किती साळसूद वाटत होता..." या धक्क्याच कारण म्हणजे आदित्य चक्क "त्याच्या" इथे बसून इतर मुला-मुलींशी बोलत होता, हसत होता, टाळ्या देत होता... आणि मी आदित्यने मला ओळखू नये, आणि ओळखलच तर किमान ती दाखवू नये यासाठी शक्य तितक्या लौकर तिथुन जायचा प्रयत्न करत होते.. इतक्यात पाठून हाक आली... "ए स्वाती... कशीयेस??" "मी बरीये आदित्य.. आणि मला परत असं ओरडून हाक मारायच्या फंदात पडू नकोस... मला तुझ्यासारख्या मुलाशी बोलायचं नाहीये" हे सगळं असंच "कंसात" बोलून मी त्याला तोंडावर "हाय, अरे सॉरी मी तुला पाहिलंच नाही... कसा आहेस??" असं म्हणून टाकलं. "मी मस्त.. बस ना इथं गप्पा मारुयात, लेक्चरला बराच वेळ आहे अजून.." आणि मला हो नाही म्हणायची संधी न देता त्याने मला त्याच्या त्या ग्रुपमध्ये ओढलं... (शब्दश:... तेव्हा मी बरीच बारीक होते... :)) आणि इथे माझी "त्याच्याशी" पहिली ओळख झाली.. तोच तो ज्याला पहिल्या दिवशी पाहिलं तेव्हा त्याच्याबद्दल भीती आणि कुतूहल दोन्ही वाटलं होतं... आणि त्यानंतर "तो" माझा जिवाभावाचा सखा झाला... अरेच्या... तुम्हाला हा "तो" कोण ते सांगितलंच नाहीये न मी.... हा "तो" म्हणजे आमच्या कॉलेजचा "कट्टा"....!!!!


तर त्यादिवशी मला त्या कट्ट्यावर मुलांमध्ये बसून गप्पा मारताना पाहून माझी ती क्रमांक १ मैत्रीण आणि तिच्याचमुळे भेटलेल्या अजून २ मैत्रिणी यांनी ताबडतोब कोपरा सभा घेऊन मला सामुहिकपणे झापायच ठरवलं... कारण या कोलेजच्या मतलबी आणि संस्कारशुन्य जगात मला सांभाळण्याची नैतिक जबाबदारी त्यांच्यावर होती.... :) "स्वाती तू त्या कट्ट्यावर काय करत होतीस?? तुला माहित्ये कशी मुलं आहेत ती?? एक नंबरची वाया गेलेली कार्टी..." त्या मुलांसोबत काहीही माहिती नसताना त्या मला फायर करत होत्या.. नी मी मनातल्या मनात हसत होते कारण कालची मी अशीच होते... कट्ट्याला आणि त्या मुलांना चुकीचं समजणारी... पण त्या दिवशी सकाळी सकाळी आदित्यने कट्ट्यावर मला बोलावून माझ्यावर खरच उपकार केले... हे असं म्हणायचं कारण म्हणजे त्यानंतर कट्टा आणि कट्टावासी इतरजण हे माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनून गेले....


त्या दिवसानंतर माझी रोजची सकाळ कट्ट्यावर उगवू लागली... आमच्या वर्गातले म्हणजे आदित्यचा कंपू सोडला तर फारसं कुणीच त्या कट्ट्याकडे फिरकायचं नाही... आणि मुली तर नाहीच नाही... पण हा मेन सर्कलचा कट्टा सोडला तर असे अनेक कट्टे FC मध्ये आहेत आणि सुख समाधानाने नांदते गाजते आहेत याचा लौकरच शोध लागला... आणि मग त्यातच आमच्या department च्या बाहेरच्या एका पारावर आमचा कट्टा स्थापन झाला... (म्हणजे कट्टा तिथेच
होता पण त्यावर आमच्या gang ने बसायला सुरुवात केली.) अनेकांनी नाकं मुरडली आम्हाला त्या कट्ट्यावर विराजमान झालेलं बघून!!! पण who cares??? च्या थाटात आम्ही "कट्टा संप्रदायी" माणसांनी आमचा दंगा आणि कट्टा अविरत सुरु ठेवण्याची शपथ घेतली... आता या संप्रदायात ४-५ मुलं आणि मी एकटीच मुलगी अशी असमानता होती पण नाविलाज को क्या विलाज?? त्यानंतर रोज लेक्चर बुडवून कट्ट्यावर बसणे, एकमेकांच्या यथेच्छ उखाळ्यापाखाळ्या काढणे, येणा-या जाणा-या लोकांची टर उडवणे असे भरपूर प्रकार आम्ही मन लावून केले... कॉलेजला जायचं म्हणजेच कट्ट्यावर जायचं हा आणि एवढाच अर्थ होता त्यावेळी... नवं नवं कॉलेज लाईफ आम्ही सुरु केलं तेच मुळी या कट्ट्याच्या साक्षीने!!! मग हळूहळू कट्ट्यावर "उच्चवर्णीयांची" (पक्षी: अभ्यासू लोक...) अधून मधून जाणवेल न जाणवेल अशी हजेरी लागू लागली. आणि कट्ट्याला एक प्रकारचं अभ्यासू वलय मिळायला लागलं... याचा आम्हा "बहुजन" समाजाला झालेला महत्वाचा फायदा म्हणजे कुणाची कुठली assignment पूर्ण झालेली आहे, ती lab मधल्या कुठल्या PC वर आहे अशी मौलिक माहीती विनासायास मिळू लागली. अधिक त्यांच्या पूर्ण झालेल्या नोटस, वर्गात कुठल्यासरांनी काय शिकवायला चालू केलय, कुठला पोर्शन almost संपत आलाय, कुठली surprise test कधीं आहे या आणि अश्या सगळ्या बातम्या आमच्यापर्यंत "सबसे तेज" पोहचायला सुरुवात झाली... पण हळूहळू या गटातले मेम्बर्स फुटीर होऊन आमच्या संघाला मिळू लागले आणि वर्षाखेरीला "उच्चवर्णीय" जमातीत १०-१२ च अपवाद उरले... (त्यामध्येच माझ्या क्रमांक १ ते ३ मैत्रिणी पण होत्या.) पण मी मात्र हे सगळं transition अगदी मनापासून एन्जॉय केलं... लेक्चर बंक करणे, proxy लावायला सांगणे, कॉलेजमागच्या अण्णाच्या टपरीवर कटिंग मारणे या एके काळी माझ्या मते टपोरी वर्गात मोडणा-या गोष्टी मी अगदी मनसोक्त जगले... याच कट्ट्यावर वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होई. अगदी शिवाजीपासून ते ह्रिथिक पर्यंत सगळ्या गोष्टींचं अगदी व्यवस्थित ज्ञान मिळे. देशाच्या वेगवेगळ्या भागातून, अगदी विदेशातूनही शिकण्यासाठी आलेली जनता हमखास भेटायची एकमेव जागा म्हणजे हा कट्टा...!!! त्यामुळे आपोआपच वेगवेगळ्या गोष्टींवर वाद विवाद होणे, वेगवेगळ्या भागांची माहीती मिळणे... हे आणि असे प्रकार कट्ट्यावर रोज घडत... माझा एक मित्र होता.. आसामचा... त्याने आसामच्या प्रत्येक भागाची इतकी सखोलपणे माहीती पुरवली होती की आमच्यातले कित्येक जण आसामला न जाता सुद्धा तिथे गाईड म्हणून आरामात काम करू शकले असते... हे भौगोलिक ज्ञान वर्गात बसून थोडीच मिळणार होते.... :)

त्यानंतरच्या एकंदरीतच संपूर्ण शैक्षणिक कालखंडात "कट्टा" हा फक्त "झाडाभोवती बांधलेला दगडी पार" न राहता आमच्या चिमुकल्या कॉलेज विश्वाचं एक सांस्कृतिक, अभ्यासू, आध्यात्मिक (हो.. हो... बरोबर वाचताय....), साहित्यिक, पर्यटनविषयक, चर्चा केंद्र झाला होता. तिथेच असंख्य ट्रेक्स चे प्लान झाले, सगळ्या पिक्चर्सची यथेच्छ चीडफाड झाली, क्रिकेटपासून ते कबड्डीपर्यंत प्रत्येक खेळावर मौलिक मते देण्याचे सत्कार्य झाले, जीवाभावाचे मित्र भेटले... (हो माझं मैत्रिणींशी तसा कमीच जमत..) या कट्ट्याने असंख्य प्रेमकहाण्या पाहील्या, काही एकतर्फी, काही दोन्ही बाजूनी तर ब-याच "सगळ्या" बाजूनी.. :) :) संध्याकाळच्या निवांत क्षणी अनेक प्रेमींनी याच्याच साक्षीने मनातल्या सगळ्या गोष्टी बोलल्या, अनेकांची तुटलेली मनेही याच कट्ट्याने सांधली. नवीन नवीन आलेल्या, बुज-या लोकांना आपल्यात सामावून घेतलं या कट्ट्याने, तर छोट्या छोट्या कारणांनी मारामारीपर्यंत गेलेले "जय आणि वीरू" पण पाहिले. याच कट्ट्यावर बसून आम्ही आमच्या भविष्याचे स्वप्न पाहिले.


कुठून तरी एक जिद्द यायची या कट्ट्यावर बसल्यावर... वर्षानुवर्षे एकाच वर्गात बसणारे महाभाग "यार बहोत हो गया, अबकी साल maths clear करकेही रहूंगा" अशी भीष्मप्रतिज्ञा घ्यायचे, तर जन्मल्यापासून मेरीट लिस्ट मध्ये यायची सवय असलेले प्राणी internal ला एक मार्क कमी का पडला म्हणून ढसाढसा रडायचे ते ही याच कट्ट्यावर.!! प्रत्येकाच्या खिशाचा अंदाज घेऊन मग टपरीवर वडापाव खायला जायचा प्लान करणारे आणि "चल बे, ५ हजार से कम मे भी कभी पार्टी होती है क्या??" म्हणून हजार हजार रुपये असेच उडवणारेही हाडाचे कट्टेकरच असायचे...!!! किती पिढ्या आल्या आणि गेल्या... आमच्या कट्ट्याने असे किती विद्यार्थी, किती ग्रुप्स, किती कहाण्या पाहील्या असतील......


आज संध्याकाळच्या शांत वातावरणात आमचा शांत पडलेला कट्टा दिसला की असं वाटतं "अरे कट्ट्याला बोलता यायला पाहिजे होतं... काय काय नि किती किती गप्पा मारल्या असत्या न त्याने..." घरातले सगळ्यात वयस्कर आजोबा आजी जसे कौतुकाने आपल्या नातवंडांच्या लहानपणच्या गोष्टी कश्या सांगतात, तसच काहीसं बोलला असता आमचा कट्टा!!!! पिवळ्या लाईटसच्या प्रकाशात वयस्कर दिसणारा आमचा कट्टा.... छे!! कट्ट्याला का वय असणारे?? उद्या आम्ही म्हातारे झालो तरी नव्या नव्या ताज्या दमाच्या चेह-यांनी गजबजून उठेल आमचा कट्टा!!! आणि परत तिथे नव्या चर्चा, नव्या गोष्टी....!!!


आज आमचे सगळे कट्टेकर इकडे तिकडे पांगले आहेत. वर्षानुवर्षे गाठी भेटी होणं दुरापास्त होऊन बसलंय. प्रत्येकाची क्षेत्र वेगळी, जागा वेगळ्या... पण
काहीही असलं तरी आमच्यामध्ये सामाईक गोष्ट तीच आहे.... "आमचा कट्टा!!!" म्हणूनच मला खात्री आहे अश्याच एखाद्या हळव्या क्षणी कट्ट्याच्या आठवणी जाग्या होत असतील. मग एकमेकांना फोन केले जातात... "अरे यार भेटून बरेच दिवस झालेत नाही??? चला एक GTG ठरवूयात...." आणि सगळे बेत ठरतात फक्त कुठे भेटायचं? हे सोडून...... कारण जर चुकून एखाद्याने हे विचारलंच तर त्याला सामुहिकरित्या शाब्दिक मार मिळतो आणि आमच्यातलाच एक जण ओरडतो... "अरे माकडा, कुठे म्हणून काय विचारतोस??? आपल्या कट्ट्यावर....."

-स्वाती......

मंगळवार, ८ जून, २०१०

आजची संध्याकाळ!!! (मीटिंग रूममधली....)


खरं तर हे जे काही मी लिहितेय ते illegal आहे आणि याची मला पूर्ण कल्पना आहे...कारण खरं तर मला या मीटिंग रूम मध्ये "महत्वाच्या" मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी बोलावलं आहे आणि ती रूम already इच्छुकांनी भरलेली आहे. त्यामुळे मला आणि माझ्याइतक्याच टुकार असलेल्या माझ्या मैत्रिणीला खिडकीच्या कट्ट्यावर बसायला जागा मिळाली आहे. ही कंपनी जॉईन केल्यापासून तसं हे आमचं टवाळ्या करण्याचा हक्काचं आणि आवडतं आसन आता त्याभोवती एक मीटिंग रूम नामक भयानक प्रकार बांधला गेल्याने नजरेच्या टप्प्याआड गेलंय. त्यामुळे आज अकस्मात त्याच ठिकाणी इतक्या official पद्धतीने जागा मिळाल्याने आम्ही मनातल्या मनात भांगडा केला... त्या ठिकाणी टेकल्यावर "सब पुरानी यादे ताझा हो गयी...!!" आणि ह्याचा पुरावा आम्ही दोघींनी एकमेकीना केलेल्या इशा-यातून मिळाला. :) मग आता सांघिक कामगिरीला सुरुवात.. मीटिंग रूममध्ये अगदी seriously बसलेल्या demotypes ची backbench वर बसलेल्या टवाळ कार्टयांप्रमाणे, हळूच टिंगल करताना आमचं लक्ष अचानक खिडकीबाहेर जातं आणि आईशप्पथ....!!!!!
दोघीजणी मनातल्या मनात "आहाहाहा...!!!" करून किंचाळलो हे चेह-यावर स्पष्ट दिसतंय.. (आम्हालाच... आमच्याच चेह-यावर!! बाकी कोणाला आमच्याकडे पाहायला फुरसत नाहीये इथे.) बाहेर काय सुंदर पावसाळी वातावरण आहे!!! संध्याकाळ झालेली आहे; त्यामुळे मंद केशरी रंगाचा शिडकावा झाल्यासारखा दिसतोय. नुकताच पाऊस पडून गेलेला असल्याने ओला झालेला रस्ता आणि त्याच्याच कडेला, टपरीवरचा मस्त कटिंग चहा मारत असलेले लोक!!! सगळे मला इथे बसल्या बसल्या स्पष्ट दिसताहेत. आणि त्यांच्या चेह-यावरच्या आनंदाची कल्पना केल्याने आमच्या ह्या रूममध्ये जळकट वास पसरल्याचा भास होतोय.... (वा... काय यमक जुळलंय?? वास-भास!! असा ठरवून जमत नाही हे... ते आतून यावं लागतं...म्हणजे कुठून ते नका विचारू....) 
तर मी काय सांगत होते... ह्म्म्म... संध्याकाळ... आणि त्यात आमच्या ऑफिसशेजारच्या बिल्डिंगमधील एका मोठ्या टेरेसवर कुणा हौशी मालक कम माळ्याने टेरेस गार्डन केली आहे... (हो... कपडे वाळत टाकण्याखेरीज ही याचा उपयोग करतात लोकं!!! सौ.(अर्थातच उचलेगिरी :) ): पु. ल.) त्या गार्डनमध्ये असलेल्या हिरवळीवर पावसाचे थेंब अजूनही अडकून राहिले आहेत. त्यावर अनवाणी पायांनी चालायची इच्छा अनिवार होते आहे!! अगदी "रिमझिम गिरे सावन" पासून ते "अबके सावन ऐसे बरसे" पर्यंत सगळ्या गाण्यांची उजळणी मनातल्या मनात चालू असतानाच....... "Swati , will u please elaborate more on this ??? " असा कुणीतरी म्हणतंय असा मला भास होतोय तेवढ्यात... तेवढ्यात माझ्या मैत्रीकर्तव्यपरायण सखीने मला जोरात ढोसून त्या पावसाळी, romantic वातावरणातून; रूममधल्या A /C च्या कुबट हवेत आणलं... (U too Brutus ???) :( खिन्न झालेय मी.... मग वेळ मारून नेण्यासाठी काहीच्या काही बडबडले.... (तिथल्याच एक दोन जणांची नावे घेऊन "as said by XYZ" म्हणून त्यांनीच मांडलेले मुद्दे परत सांगितले..... च्यायला हाकानाका :) :) ) आणि हुश्श परत खाली बसले.... Brutus ला बाहेर भेट मग सांगते असा दम दिला पाहिजे.....
मग परत मी त्या romantic वातावरणात आलेय..... असा वाटतंय अगदी आत्ता माझा अनिल कपूर येईल आणि "रिमझिम रिमझिम, रुमझुम रुमझुम, भिगी भिगी ऋत में तुम हम, हम तुम" सुरु करेल!!! आणि मग में पण त्याला "भिगी भिगी रातो में, मिठी मिठी बातो में, ऐसी बरसातो में कैसा लगता है???" असं खट्याळपणे विचारून हळूच त्याच्या मिठीत शिरेन!!! "अगं स्वाती, control कंट्रोल, कुठे बसलीयेस?? काय विचार करतेयस??" माझ्या मनातला Brutus सुरु झालाय. "शी बाबा.... या सुंदर वातावरणात इथे आतमध्ये बसून ह्या असल्या रुक्ष चर्चा करणं गरजेचं आहे का?" (आता तुमच्यापैकी काही जण म्हणतील "its part and parcel of ur duty" ) सगळं मान्य आहे हो पण हा पाऊस आहे न त्याचाच दोष आहे हा सगळा!!!! नुसता तो येण्याची चाहूल जरी लागली न तरी मन वेडं होऊन उठतं.... मग या सगळ्या मिटींग्स, हे सगळे प्रोजेक्ट्स, सगळ्या टास्क शीट्स सगळं सगळं गेलं चुलीत म्हणत उठावं आणि मस्तपैकी "दूर दूर नभापार, डोंगराच्या माथ्यावर, निळे निळे, गार गार पावसाचे घरदार" शोधात अंगावर "सरीवर सर" घेत हिंडत राहावं असं मला तरी वाटतं!!!!!!!!!!! तुम्हाला???

(त. टी.१ : एक अख्खा लेख संपत आलाय तरी मीटिंग संपायच नाव नाही घेत..... :( देवा नारायणा... किती रे असं illegal लिखाण करवून घेशील म्या पामराकडून???)
 त. टी.२ : आमच्या Brutus ने केलेला illegal लिखाण पण तिच्या ब्लॉगवर येईलच लवकर...!!!!)
- स्वाती......

सोमवार, ७ जून, २०१०

७ जून....

आज सकाळी आईने बिल भरायचं आहे... असा सांगून चेक हातात ठेवला. त्यावर आजची तारीख ७ जून २०१० लिहिताना हात जरासा थबकला. काहीतरी आठवतंय.... पण नेमकं काय? मनात काहीतरी सुरु झालंय त्या तारखेने.. पण नक्की काय शोधू पहातंय मन?? याच विचारात गाडी सुरु केली आणि ऑफिसकडे कूच केलं. जाताना पण मनात विचारांनी गर्दी केली; अगदी जशी शाळेच्या पहिल्या दिवशी आम्ही लहान मुलं प्रार्थनेला उभी राहताना करायचो न तशी...!!! आणि याच विचारासरशी कळलं.... ७ जून... पहिला दिवस... शाळेचा.... स्मित हेच तर आठवत होतं इतका वेळ....

लहानपणी माझ्या शाळेची सुरुवात ७ जूनलाच व्हायची. म्हणजे जरी ७ जूनला रविवार असला तरी वेळापत्रकावर शाळा ७ जूनलाच सुरु झालेली असायची.... आणि माझी शाळा तर त्याच्याही आधी म्हणजे १ जूनपासूनच!!! "पप्पा मला यावेळी नवीन दप्तर, नवे बूट आणि हो नवा पेन्सिलचा box पण हवाये." ही असायची माझ्या शैक्षणिक वर्षाची नमनाची वाक्यं!!! अर्थात वयानुसार आणि गरजानुसार लिस्ट बदलत गेली पण सूर एकंदरीत हाच राहिला. मग मागणी कितपत पूर्ण होतेय याचा आगाऊ अंदाज घेऊन मग केलेली आदळ-आपट, रडारड या सगळ्यांचा योग्य तो परिणाम होऊन अखेरीस शाळेला आनंदाने नवं दप्तर घेऊन दिमाखात जाणारी मी....शाळेचा पहिला दिवस म्हटलं कि हेच आठवत मला....

तेव्हा शाळा आणि पाऊस एकत्रच सुरु व्हायचे...!! ७ जून म्हणजे मॉन्सूनच आगमन अगदी ठरल्याप्रमाणे असायचं. किमान त्यादिवशी पावसाची एकतरी जोरदार चळक यायचीच. मला अजूनहि आठवतं; सकाळची शाळा असायची. आम्ही सगळी मुलं डबा खात असताना ढगांचा जोरदार गडगडाट व्हायचा, सगळीकडे अंधारून यायचं आणि मग धुवाधार पाऊस यायचा. खिडकीजवळच्या मुला-मुलींची दप्तर वाचवण्यासाठी धावपळ व्हायची. बाई वर्गात येऊन तिथल्या ट्यूब लाईट लावायच्या... त्या वयात त्या ट्युब्सच पण आकर्षण वाटायचं. आणि आम्ही सगळी चिल्लीपिल्ली त्या खिडकीतून बाहेरचा पाऊस बघत बसायचो. आमचे मोठे दादा ताई लोकं मैदानावर जाऊन पहिल्या पावसाची मज्जा घ्यायचे. बाई स्वत: त्यांना घेऊन जायच्या पावसात. तेव्हा लौकर "मोठ्ठं" होण्यामागे ते एक प्रमुख कारण होतं "शाळेत जाऊन पावसात खेळायला मिळायला हवं म्हणून!!!"
हे झालं ३री-४थी नंतरच... जेव्हा शाळेत जाणं हा एक अति आनंदाचा भाग असायचा. पण त्याआधी शाळेत जाताना बाहेर काय पाऊस पडत असेल इतका पाऊस माझ्या डोळ्यात असायचा. जणू काही आई पप्पा मला काळ्या पाण्यावर पाठवतायेत अश्या अविर्भावात मी रडायचे. (हे अर्थातच पप्पांच्या आठवणीतलं वाक्य आहे) दप्तर फेकून दे, डबा सांड, हात पाय आपट हि आणि असली सगळी नाटकं करून मग शाळेत जायचे. (म्हणजे मला पाठवलं जायचं) पण एक होतं मी एवढं रडून पडूनसुद्धा आईने कधीच मला शाळेचा पहिला दिवस बुडवू दिला नाही. प्रत्येक गोष्टीसाठी तिच्याकडे प्रतिहल्ला तयार असायचा... "दप्तर टाकलस, हे घे दुसरं दप्तर", डबा सांडला म्हणेपर्यंत आतून दुसरा डबा आणि पाण्याची बाटली हातात.. मग मी हताशपणे माझं चंबूगबाळ आवरून शाळेकडे चालायला लागायचे. (अंगणवाडी ते २री माझी शाळा घराला लागुनच होती.) तेव्हा शाळेत न जायचं एक हुकमी कारण म्हणून मला पावसाची प्रचंड मदत व्हायची. पप्पा मला सोडायला चालत यायला लागले आणि पाऊस सुरु झाला की मग मी रडकुंडीला येऊन "पप्पा मला नाही जायचं" असं म्हणायचे कि मग ते मला शेजारी असलेल्या काकाकडे घेऊन जायचे. मग काय आम्ही आमच्या मनाचे राजे. इतका वेळ "मला पावसात भिजून शेंबूड येईल ना गं आई!!" असं म्हणून रडणारी मी त्याच पावसात हुंदडत असायचे. मला तिथेच खेळताना पाहिलं की आई अजून ओरडायची. पण तेव्हा त्या पावसात खेळताना तिच्या चिडण्याच पण काहीच वाटायचं नाही. मग शाळेत आम्हाला बसवून ठेवण्यासाठी बालवाडीच्या आमच्या बाई वेगवेगळे प्रकार करायच्या. कागदी होड्या तयार करून बाहेरच्या डबक्यात सोडणे, कुणाची होडी जास्त वेळ तरंगते याची स्पर्धा लावणे (क्वचित त्या स्पर्धांचे निकाल एकमेकांना चिखलात पडून मारामा-या करण्यानेसुद्धा व्हायचे. होडीचं तर कधीच टायटेनिक झालेलं असायचं.) मग शाळेत गरम गरम पोहे, उपीट, शिरा असं जंगी बेत असायचा. (शासनाने खिचडी वाटप सत्कार्य हाती घ्यायच्या आधीपासून आमच्या बाई स्वत:च्या घरून सगळे सामान आणून स्वत: नाश्ता बनवायच्या शाळेत.) बाहेर पाऊस पडत असताना वर्गात एकमेकाजवळ बसून, थंडीने कुडकुडत असताना वेगवेगळ्या कविता म्हणत केलेला तो नाश्ता आजही आठवतो. शाळेतल्या पावसाची हि एक अजून सुंदर आठवण!!!

३री मध्ये मोठ्या शाळेत गेल्यावर सगळ्या गोष्टींच अजून अप्रूप वाटायला लागलं. पप्पांचा हात धरून शाळेत जाणारी मी, आता रिक्षात बसून अधिक जबाबदारीने शाळेत जायला लागले. आणि साक्षीला तो होताच!! नित्यनेमाने येणारा... मग काय "वोटरप्रूफ दप्तर" हा शाळेत नुकताच लागलेला शोध आपल्या घरी नाकारला गेल्यावर; "मग माझी वह्या पुस्तक भिजली तर मी काय करू???" या निरागस प्रश्नाला "प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये नीट ठेवून मिळालेली वह्या पुस्तके" हे उत्तर शिरोधार्य मानून मी "मोठ्या" शाळेत जायला लागले. नवा, नवा गुलाबी फुला फुलांचा रेनकोट घालून शाळेत जाताना जी धमाल यायची ती आज कारमध्ये बसून ऑफिसला जाताना कुठेतरी हरवली आहे.

नंतर मोठ्या वर्गात गेल्यावर पावसानंतरचा मातीचा सुवास, हवेत पसरणारा आल्हाददायक गारवा वगैरे गोष्टींशी परिचय झाला आणि लहानपणीच्या "आई पाऊस आला......" चं "पावसाची भूरभूर सुरु झाली...." मध्ये रुपांतर झालं. आता न्यायला रिक्षावाले काका येत नसत.. माझी मीच छानपैकी तयार होऊन नव्या को-या सायकलवर शाळेत जायला लागले. आता खूप मोठा बारदाना सांभाळत शाळेत जायची कसरत सुरु झाली. दप्तर, रेनकोट, डब्याची पिशवी, सायकल आणि मी!! त्यामुळे दर २-३ दिवसांनी भूमातेला साष्टांग नमस्कार ठरलेलाच असायचा. PT च्या दिवशी तर हालतच व्हायची. पांढरे बूट!! जे कितीही पाऊस पडत असला तरी पांढरेच राहायला हवेत असं आमच्या सरांचा आग्रह (की दुराग्रह??) असायचा. त्यामुळे त्यादिवशी आमच्या बारदान्यात अजून एका पिशवीची भर.... बुटांची पिशवी.. त्यादिवशी मात्र एरवीचा मित्र वाटणारा पाऊस शत्रू नं. १ असायचा. पण ते काहीही असलं तरी वर्गात बसलेलं असताना खिडकीतून बाहेर पडणारा पाऊस पाहणे, त्याचे आतमध्ये येणारे चुकार थेंब हातावर झेलणे. या आणि अश्या अनेक गोष्टीनी माझं शालेय जीवन अगदी पावसावरच्या निबंधासारखं सुंदर केलं.

तेव्हा मातीचा वास, नव्या नव्या पुस्तकांचा वास आणि एवढेच काय पण नवीन घेतलेल्या नटराजच्या खोडरबरचा वास, बाईंबरोबर डबक्यातल्या पाण्यात खेळलेली डबा ऐसपैस, "चला मुलानो, पावसात भिजून येऊया.." म्हणणारे आमचे शिपाइकाका, एकमेकांच्या हाताला धरून; निसरड्या रस्त्याला घाबरत घाबरत केलेली वर्षा सहल....!!! हे सगळे निरागस क्षण असे माझ्या आठवणींच्या पेटीत बंद करून ठेवले आहेत त्या ७ तारखेने आणि ना चुकता त्या दिवशी येणा-या त्या पावसाने!!!

आज अचानक ७ जून २०१० तारखेने त्या पेटीचं कुलूप काढलं आणि सगळं कसं माझ्या डोळ्यांसमोर लख्ख उभं राहिलं!!! आज सकाळपासून ५-६ वेळा बाहेर जाऊन पाहिलंय; पण अजून तरी माझ्या लहानपणीच्या पावसाने हजेरी दिलेली नाहीये. "अरे शाळा सुरु झाली रे माझी.... ये ना आता तरी!!!" मुक्यानेच साद घालतेय त्याला.... पण मला माहितीये तो आत्ता येणार नाही... लहानपणीचा सवंगडी आहे माझा!! त्याची अट आहे "तेव्हा जशी यायचीस मैदानावर धावून तशी येणार असशील तरच येतो मी...." आणि मी मात्र माझ्या काचेच्या केबिनमध्ये बसून त्याला "माझा आत्ता एक Client call आहे रे... नाही जमणार!!" अशी मलाच नं पटणारी कारण देत जागेवरच बसून आहे.....!!!!!!

-स्वाती......

मंगळवार, २५ मे, २०१०

जीव दंगला, गुंगला, रंगला असा....!!!

"जीव दंगला, गुंगला, रंगला असा....!!!" कानात गाणं चालू आहे आणि मनात त्याचे विचार... नकळतच कधीतरी मन त्या गाण्यात मला आणि त्याला पाहू लागतं आणि मग सुरु होते ती एक असह्य तगमग!!! अनिवार ओढ लागते त्याची आणि त्याच्या असण्याची... गाण्यातला पाऊस दाटून राहतो माझ्या सभोवती.. आणि माझ्याही नकळत माझ्या डोळ्यात... हरिहरनच्या आवाजातली आर्तता आणि श्रेयाच्या आवाजातली व्याकुळता उतरत जाते खोलवर कुठेतरी...!!! तिथेच व्यापून राहिलेला असतो तो.. अथांग...!!!



त्याचा ध्यास लागणं हे माझं प्राक्तनच असावं जणू... गहिवरला श्वास अजून कुठेतरी अडखळतो आणि मग सगळं सगळं धूसर होत जातं. श्रेया गातच असते "पैलतीरा नेशील साथ मला देशील, काळीज माझं तू!!!" आणि मग त्या प्रत्येक वाक्याशी स्वत:चं नातं ताडून बघते मी... असाच आधार वाटतो मला त्याचा, त्याच्या असण्याचा.... त्याची साथ असेपर्यंत मला कुठल्याही ढगाळ वातावरणाची, रुढींची काळजी नाही... तो असेपर्यंत माझं माझ्याशी असलेलं नातं तसंच अस्पर्श राहील याची खात्री देतो तो मला.... मी त्याची बनून जगत राहीन आणि सुख भरतीला येईल....


असंच होतं आज काल माझं... कुठलंही गाणं लागलं की त्याची आठवण होणं अगदी स्वाभाविक होऊन बसतं.. मग ते संदीपचं "तुझे नी माझे नाते काय??' असो किंवा अजय अतुलचं "स्वर्ग हा नवा" असू दे... आणि मग सुरु होतो एक खेळ माझा माझ्याशीच!!! सगळे सगळे क्षण आठवतात... त्याच्यासोबतचे... मनापासून बेधुंद जगलेले.... आणि मग हळूहळू माझ्याभोवती एक कोश तयार होतो त्यांचा... मी आणि तोच असतो त्या कोशात.... तो माझ्यासोबत हसतो, रुसतो... माझ्या खोड्या काढतो... मला हसवतो... आणि मग माझ्याकडे बघणारे मित्र मैत्रिणी हसतात मला... वेडी म्हणतात... बरोबर आहे, उगीचच स्वत:शीच हसणा-या मला पाहून दुसरा विचार काय येणार न??? पण मला त्या कशाशीच तमा नसते. मी असते तशीच त्याच्या खांद्यावर डोके ठेवून त्याच्या कानात कुजबुजणारी..!!! एका वेगळ्या जगात रमलेली....


खरच जेव्हा त्याने कामानिमित्ताने काही दिवस त्याला माझ्यापासून लांब राहणे अपरिहार्य आहे असे सांगितले तेव्हा मुसमुसून रडले होते मी... भांडले होते स्वत:शीच... कारण एक मन म्हणत होतं कि तो त्याच्या आवडत्या क्षेत्राकडे चालला आहे... तू उगाच त्याचा तिकडे जाण्याचा क्षण अजून अवघड करू नकोस... आणि हिरमुसली होऊन बसून राहिले होते... कारण त्याच वेळी दुसरं मन फक्त लांब राहण्याचा काळ मोजत होतं.... इतकी वर्ष??? हाच एक विचार बाकी सगळ्या सगळ्या गोष्टीना खोटं पाडत होता... पण त्याच्यासमोर यातलं एक अवाक्षरही न उच्चारता त्याला "तू जा.. मी वाट पाहीन" असं शांतपणे सांगितलं होतं!! आणि त्या क्षणापासून सुरु झाला हा प्रवास.... त्याचा त्याच्या ध्येयाकडे आणि माझा माझ्याकडून माझ्याकडे... त्याच्या नसण्याची सवय होता होता कित्येक रात्री उशी भिजवली आहे... "कसे सरतील सये, माझ्याविना दिस तुझे...." या गाण्यातला शब्दन शब्द जगत होते मी... तो होता सतत माझ्याजवळ, माझ्यासोबत... पण मनाने... एखाद्याच्या असण्याची इतकी आतुरता, इतकी गरज एखाद्याला असू शकते??? नाही सापडत याचं उत्तर... मग नुसते प्रश्न, प्रश्न फिरत राहतात माझ्या सभोवती... ना त्याला सांगू शकते, न लपवू शकते अश्या द्विधेत सापडते... मनात कुठेतरी माहित असतं कि या सगळ्यात तो आहे माझ्यासोबत... जे मी इथे सहन करतेय तेच तो तिथे....


पण मग मनात परत तोच सनातन प्रश्न... या इथे आणि तिथेचा अंत कधी होणार?? पाहिलेली इतकी स्वप्नं... मनातच रचलेले इतके सगळे मनोरथ... हे सगळं कधी होणार पूर्ण? पण कुणाला विचारायचे हे सगळे प्रश्न... मग ज्या गाण्यांनी हे सत्र सुरु केले असते त्या गाण्यांनाच परत शरण जाते... आणि परत संदीप खोडकरपणे सांगू लागतो "प्रेमात म्हणे, कुणी हुरहुरते, कुणी मोहरते राणी" आणि मग मी त्याला गालातल्या गालात हसून दाद देते आणि स्वत:ची हुरहूर आणि डोळ्यातील काहूर हळूच निपटून टाकते...!!!!!!
 
- स्वाती....

बुधवार, १७ मार्च, २०१०

आम्ही पाहीलेले (की भोगलेले...??) स्नेह्संमेलन!!

(हा लेख मी आणि माझा एक मित्र (जो दुर्दैवाने आता हयात नाही.. :( ) असं दोघांनी मिळून लिहीलेला आहे.)

माणसाची व्याख्या अनेकांनी (म्हणजे माणसांनीच) आपापल्या परीने केली आहे. कुणाच्या मते माणूस हा ’समाजशील’ प्राणी आहे. पण माणूस आणि समाजात ’स’ आणि ’म’ शिवाय काहीही साम्य नाही. बहुधा सर्व माणसे समाजात ’शील’ राखण्यासाठी जगतात म्हणून हे नाव पडले असावे.
काहींच्या मते माणूस शिस्तप्रिय प्राणी आहे. पण मुंग्यांशिवाय या जगात कुणीही सरल चालत नाही. तात्पर्य काय तर माणसाची व्याख्या (माणसांनीच केलेली) अपूर्ण आहे.

खरे म्हणजे माणूस हा स्नेहसंमेलने करणारा प्राणी आहे. माणसांशिवाय इतर कुणीही प्राण्यांनी स्नेह्संमेलने केल्याचे ऐकीवात नाही. सिंह आणि वाघ शेजारी बसले आहेत, मोर सुंदर नॄत्य करतो आहे, कोकिळा गाणे गात आहे, हत्ती-घोडे सर्कस करीत आहेत, कोल्हा सूत्रसंचालन करत आहे. असे संमेलन कधीच नसते. (शंकेखोर वाचकांनी इसापनीतितील प्राण्यांचा विचार करु नये.)

म्हणूनच माणूस हा स्नेह्संमेलने करणारा प्राणी आहे. "खरीप हंगामात रब्बी पिकांची लागवड" पासून ते "अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन" पर्यंत अनेक संमेलने होत असतात. काहींच्या मते संमेलनांना निमित्त लागते परंतु वास्तविक पहाता संमेलनांच्या निमित्ताने लोक आपले (अ)विचार, कला सादर करतात. इतर कुठल्याही ठिकाणी वाचल्या किंवा ऐकल्या न जाऊ शकणा-या कविता कवी लोक "अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात" (येथे मराठी ऐवजी हिंदी, बंगाली, इंग्रजी, कन्नड इ. लिहीता येऊ शकतात.) ऐकवतात. काही हौशी पालकांनी आपल्या मुलांना हट्टाने तबला, पेटी, गायन इ. क्लासला घातले असल्यास, ती मुले संमेलनात आपली कला दाखवून आपल्या पालकांचा निर्णय कसा चुकीचा होता हे दाखवून देतात.

अशाच एका स्नेहसंमेलनाला जाण्याचा परवा योग (की भोग?) आला. संमेलनाला अध्यक्ष कोण, हा प्रश्न गौण असतो. श्री. कुक्कुटराव मुर्गीवाले (मालक: कुक्कुटेश्वर पोल्ट्री प्रा. लि.) पासून ते श्री. मा. ज. लेले पर्यंत कुणीही अध्यक्ष म्हणून चालतो. लोकांना वाटतं अध्यक्ष होणं म्हणजे काय? दोन शब्द बोलायचे आणि खुर्चीवर जाऊन बसायचं, पण वास्तविक ज्यांचं जळलं आहे त्यांनाच कळेल. अध्यक्षांना कारण नसताना संबंधित संस्थेवर स्तुतीसुमने उधळावी लागतात. परत भाषण सुरु झाल्यावर लोकांना इन्टर्वल झाला आहे असा गैरसमज होण्याचा धोका असतो. बक्षिस वाटपाला तर फ़ारच पंचाईत होते. एखाद्या मुलीला बक्षिस देताना (प्रथम क्रमांक: लिंबू चमचा शर्यत) उगीचच कौतुकाने हसावे (व नंतर फ़सावे) लागते. आता लिंबू चमचा शर्यत प्रथम क्रमांक यात कसले आले आहे कौतुक पण हसतात बिचारे... काही उत्साही पालक आपल्या मुलांचे वेगवेगळ्या प्रकारे फोटो काढतात. त्यामुळे अध्यक्षांना वेगवेगळ्या पोजेसला उभे राहावे लागते. सर्वात कठीण म्हणजे पुढील सर्व कार्यक्रम खुर्चीवर बसून न हालता (व न झोपता) पाहावे लागतात. तात्पर्य काय तर संमेलनाचा अध्यक्ष कोण हा प्रश्न गौण आहे.

कुठलेही संमेलन वेळेत सुरु न होणे हे ढगातून पाणी पडण्यासारखे स्वाभावीक आहे. (ढगातून पाणी पडण्याचा आणि वेळेचा इथे आईशप्पथ काहीही संबंध नाही.) तर ते किती उशीरा सुरु होते यावर त्याचे महत्त्व ठरते.

कुठल्याही संमेलनाला संयोजक हवा असतो. आम्ही उपस्थित असलेल्या सर्व कार्यक्रमालाही संयोजक होते. संयोजकाच्या अवतार लग्नातल्या नव-याच्या भावासारखा होता. संयोजकही निवडावा लागतो. अतिशय स्थितप्रज्ञ संयोजक समारंभाचा विचका करु शकतो. तो थोडा भांबावलेलाच असला पाहीजे. तो एका वेळी अनेकांना सुचना देण्याइतपत अष्टावधानी असतो. "अरे राजा फ़ुलं आण, नारळ कुठे आहे? टेबल सांडेल ना..- उभा धर, अरे इकडे खुर्च्या लौकर फ़ोड..- अरे तो माईकवाला आला का? पडदा लावला का? सतरंजी इकडे नको तिकडे...." यातून कार्यकर्त्याला आपल्यासाठी कोणती सुचना आहे हे कळावे लागते. त्यांचे प्रश्न असतातच....
पहिला: सर फ़ुलं नाही आली.
दुसरा: टेबल
तिसरा: क्लॉथ
चौथा: टेबल क्लॉथ
पहिला: सर, अध्यक्षांचा फ़ोन होता, त्यांना उशीर होईल.
खुर्चीवाला: सर, स्पीकर बिघडलाय.
माईकवाला: सर, खुर्च्या कमी पडतायेत.
एक प्रेक्षक: सर, प्रेक्षक घाई करताहेत.
पहिला: सर, लाईट कुठे लावू?
दुसरा: सर, सतरंज्या कुठे घालू?
तिसरा: सर, सरस्वतीचा फोटो कुठे लावू?
.
.
.
.
.
सतरावा: सर, नारळ कुठे फ़ोडू?
संयोजक: माझ्या डोक्यावर...
पहिला: नाहीये त्यांना... म्हणजे अध्यक्षांना वेळ नाहीये.

असे करता करता शेवटी संमेलन सुरु होते. सुत्रसंचालक माईकवर "हेलो हेलो" का म्हणतात कोण जाणे? कदाचीत कुणाचे नाव पुकारले आणि माईक बिघडला असल्यास विपर्यास होऊ शकतो. परंतु प्रेक्षकांचा गोंधळ आटोक्यात आणण्यासाठी हे म्हणत असावा (हेलो हेलो हा शब्द ’हळू हळू’ ची व्युत्पत्ती.) गणेश वंदनाने, गायनाने कार्यक्रमाची सुरुवात होते. केवळ हे देवाचे गाणे असते म्हणून लोक आधी आवंढा व नंतर राग गिळून गप्प राहतात. संमेलनाचे सुत्रसंचालक आठवतील तेवढ्या म्हणी, सुविचार यांचा मुक्त कंठाने वापर करतात. खरं तर "टवाळा आवडे विनोद" हे वाक्य एक विनोदी नाटकानंतर म्हणायची काहीच आवश्यकता नसते. माईकमधून किं........ असा आवाज येतो तो नेमका नाटकाच्या वेळीच का कोण जाणे??

कलाकारांचे ’जवळून’ दर्शन फ़क्त एकच जण घेऊ शकतो किंबहुना ते तो घेतोच, तो म्हणजे फोटोग्राफ़र. नेमका नाच रंगात आला असताना त्याच्या अंगात येते. प्रेक्षकांच्या भावनांशी त्याला काहीही घेणे देणे नसते. अख्ख्या कार्यक्रमात न हसणारे आणि न बोलणारे दोघेच.. एक माईकवाला आणि दुसरा फ़ोटोग्राफ़र! फ़ोटोग्राफ़र ’नटसम्राट’ असु दे किंवा पाश्चात्य पद्धतीचे नॄत्य असु दे, एकाच अलिप्त भावनेने पाहतो.

काही मंडळी उगाचच इकडून तिकडे फ़िरत असतात. लग्नात ज्याप्रमाणे करवल्या हिंडतात त्या आविर्भावात... बहुतेकांची अशी समजूत असते की ’तो’ किंवा ’ती’ आपल्याकडेच ’बघतो’ किंवा ’बघते’ आहे. त्यामुळे तेही हळूच बघून घेतात. वास्तविक त्यांचा यात काहीही सहभाग नसतो. तरीही उगाचच पुढे पुढे करतात. ह्यांना एका जागी बसल्यावर अपमानित झाल्यासारखे वाटत असावे किंवा त्यांना उभे राहून जास्त मजा येत असावी.

अशातच पडेल ते काम करणारे काही स्वयंसेवक असतात, (पु. लं. च्या नारायणप्रमाणे). इतर वेळेस यांच्यावाचून काहीही न करता येणा-यांचे ते सत्काराला किंवा फोटोसाठी आले नाहीत तर काहीही अडत नाही. बरोबरच आहे, ते जर स्टेजवर आले तर पडद्यामागची सुत्रे कोण हलवणार? कार्यक्रम संपल्यावर अल्पोपहारात जेव्हा सगळेजणं मशगुल असतात तेव्हा ते रिकाम्या प्लेट्स आणि शीतपेयांचे रिकामे ग्लास उचलत असतात.

(तळटीप: चाणाक्ष वाचकांना प्रस्तुत लेखकाने (म्हणजे आम्हीच) पु. लं. च्या लेखनाची (असफ़ल??) नक्कल करण्याचा प्रयत्न केल्याचा दाट संशय येईल. साहजिकच आहे, त्यांची चार-पाच पुस्तके आजूबाजूला ठेवूनच हा लेख लिहिला आहे. क. लो. अ.)

-स्वाती...

सोमवार, ८ मार्च, २०१०

स्वयंवर नही शादी..... (कर्म माझं!!!!)

अरे हे काय चाललंय काय?? कुणीही यावं आणि टिकली मारुन जावं सारखं कुणीही उठावं आणि स्वयंवर मांडावं असं चालू झालंय.... पूर्वीच्या काळी म्हणजे महाभारतात वगैरे... पोरींची स्वयंवरं ठेवली जायची... (म्हणजे राजे लोकांच्या)... आणि आज काल....
बाई-माणसांची (पक्षी सावंतांची राखी) आणि स्वतःला माणूस म्हणवणारा एक द्विपाद प्राणी (पक्षी राहुल महाजन) यांची स्वयंवरं... म्हणून म्हटलं अरे काय चाललंय काय???
आमच्या या वरील चीडचीडीचं कारण तुम्ही हा परम प्रताप पाहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. म्हणजे राखीचं लग्न पाहायची संधी तुम्ही हुकवली असेल तर NDTV Imagine नामक एक वाहीनी तुमच्यासाठी सध्या एक नवीन उच्छाद मांडत आहे... "राहुल का स्वयंवर!!" राहुल दुल्हनीया ले जायेगा वगैरे असं काही तरी.. (खरं तर दुल्हनीयांचा आविर्भाव पहाता त्याच राहुलला घेऊन जातील असं जास्त वाटतं... )
आता तुम्हाला प्रश्न पडेल की इतका प्रोब्लेम आहे तर ही मालिका पहावीच कशाला?? पण त्याची काही मुलभूत कारणे पुढीलप्रमाणे:
१. सहनशक्ती वाढते.
२. जगात यांचीही लग्नं होतात मग आपण तर बरेच चांगले आहोत. (लग्नेच्छू तरुणाईला दिलासा...)
३. पैसा असला की तो कुठेही वहातो याची जाणीव होते.
४. समर्थांनी मुर्खांची एवढी लक्षणे सांगूनही आणखी बरीच उरली आहेत याची कल्पना येते.....
अशी अजुन य कारणं सांगता येतील पण तुर्तास वानगीदाखल एवढी पुरेत...
तर या जीवघेण्या प्रकाराची सुरुवात झाली ती राखी सावंत हिच्या स्वयंवराने.. ज्यांनी ज्यांनी हा भीषण प्रकार पाहीला त्यांना त्या दुःखद क्षणांची आठवण करून दिल्याबद्दल क्षमस्व! पण ते काय आहे ना कि खपली काढायची जीत्याची खोड आहे आमची...
असो... कु. सावंत हीने स्वतःला जाहीररीत्या चि. सौ. कां. घोषीत केले, आणि सुरु झाला एक खेळ.. (जो पुढे बहुतेकांच्या लग्नांवर बेतला.) तीचे स्वयंवर मांडायचा उत्साह एवढा होता कि विचारू नका. लहान लहान मुलांपासून ते म्हाता-या माणसांपर्यंत प्रत्येक जण राखीचा दुल्हा व्हायला उत्सुक.. शेवटी तीने त्यातल्या त्यात एक बिचारा (कोणी तरी आंग्लभाषीक आहे म्हणजे होता...) निवडला आणि स्वयंवर म्हणजे साखरपुडा असा स्वतःला सोयीस्कर (आणि त्या बिचा-याची थोडक्यात सुटका करणारा) अर्थ लावुन ती बया मोकळी झाली.
असो.. तेव्हा परत असं काही पहाणे नाही रे बाबा असा (सुटकेचा) नि:श्वास टाकुन आम्ही "त्या इंग्रजाची लौकर सोडवणूक कर रे!" अस देवाला विणवू लागलो. (हो मग.. हीच्या हौसेसाठी त्याला का जन्मठेप.. कुठल्याच पापाला ही शिक्षा असू शकत नाही.)
पण त्या परमेश्वराच्या मनात अजून एकदा आमची कुचेष्टा करायची लहर आली आणि त्याने NDTV Imagine ला अजून एक कानमंत्र दिला.
स्वत: श्री. राहुल महाजन यांचे स्वयंवर.. चुकले स्वयंवर नही शादी.. (अर्थातच दुसरे)
आणि आम्ही ते पाहिले. (हो घडलेल्या पापांची कबुली दिलीच पाहिजे नाहीतर पुढ्च्या जन्मी राखी सावंत होते म्हणे..)
तर या छळवादाची सुरुवात झाली १७ तरुणींपासून आणि लग्नाचा संयोजक होता अर्थातच तोच तो... राम कपूर!!! (याचा पत्ता द्या रे कुणीतरी!!)
सतत नळावर जमलेल्या बायकांप्रमाणे भांडणा-या नवतरुणी, विनाकारण चीड आणणारे हसू हसणारा तो महाजनांचा पो-या.. (च्यायला... बाप का नाम पूरा मीट्टी में मिलाई दिये...) आणि चेह-यावर अशक्य तुपट, आनंदी भाव ठेवणारा तो राम.. बघूनच एखाद्याला उलटी यावी. अश्या या समस्त लोकांनी अव्याहतपणे चालवलेला हा मदा-याचा खेळ म्हणजे "राहुल का स्वयंवर.... नहीं शादी!!"
एका एका तरुणीची या भयानक प्रकारातून सुटका होत होत शेवटच्या चार जणी उरल्या... (अहो यात चक्क एक जण आमच्या पुण्याची पण होती हो..) का?? का?? देवा, माझ्या अविवाहीत मित्रांवर हा अन्याय??? मग तो त्यातल्या प्रत्येकीच्या घरी जाण्याचे सोपस्कार सुरु झाले. घरचे सगळे लोक तो अगदी जावई असल्याप्रमाणे त्याचे लाड करत होते. (सोन्याच्या चमच्याने त्याला पोहे भरवल्याचे आम्ही या डोळ्यांनी पाहीले आहे हो...) बाकी या असल्या चेह-याच्या (आणि चरित्राच्या) माणसाचे कौतुक कसे काय करावेसे वाटते बाबा लोकांना??
यानंतर पुणे कन्या या खेळातून (की छळातून?) बाहेर पडली...(हुश्श... सुटलीस गं बायो!!) आणि उर्वरीत तिघींची परवड सुरु झाली. काय त्या राहुलचे ते चाळे,काय ते हसणं,वागणं,बोलणं,बघणं... आणि उच्चांक म्हणजे ते लाजणं... (अरे का लाजतोयस?? लग्न पहिल्यांदा का होतंय तुझं?? असं ओरडावंसं वाटायचं..)
शेवटी होता होता हा प्रकार शेवटाला आला आणि राहुलच्या लग्नाचे थेट प्रक्शेपण सुरु झाले. अनेक रिकामटेकडे पुरुष आणि स्त्रिया उगाच घरचे कार्य असल्यासारख्या तिकडे मिरवत होते. हळदी, मेहंदी, संगीत सगळीकडे साग्रसंगीतपणे हा जोकर मिरवल्यावर त्याची "आली समीप लग्नघटीका" आणि राहुल "अवतार"ला... (त्यावेळी वरातीत "तेणु दुल्हा किसने बनाया भुतनीके" हे समर्पक गाणे लावायला हवे होते...) :)
मग पट्कन निकाल सांगून मोकळे व्हायचे तर तो राम परत परत सगळ्यांना कसं वाटतंय?? कसं वाटतंय?? असं विचारून उगाच डोकं खात होता. (आता कितीही नको नको वाटत असलं तरी कुणी TV वर सांगणारेत का? की ’चल गं बाई घरी दुसरा मिळेल आपल्याला ब-यापैकी’ असं.. आमच्याइतका स्पष्टवक्तेपणा अभावानेच आढळतो म्हणा..)
तर मग ब-यापैकी उत्सुकता (बळंच हं.. जणू काही आम्ही फ़टाकेच उडवणार होतो याचं लग्न झालं की..) ताणून धरल्यावर त्याने त्यातल्या त्यात ब-या मुलीच्या गळ्यात (एकदाची!) माळ घातली. (आणि इतर दोघींनी मनातल्या मनात दिवाळी साजरी केली.)
आणि मग काय विचारता लोकांच्या चेह-यावरचा आनंद.. आहाहाहा... धन्य झालो आम्ही... (संपलं एकदाचं च्यामायला...)
आणि मग... अचानक आठवलं.. (त्याच त्या रामला.. पत्ता द्याच त्याचा...) कि अरे हे तर स्वयंवर नही शादी आहे... मग झालं.. समोरच मंडप टाकलेला आणि दणक्यात महाजनपुत्राची शादी झाली.. आणि कार्यक्रम संपला संपला म्हणता म्हणता वाढला..... :( [हे सगळे चालू असताना आम्हाला ओरडून विचारावेसे वाटत होते कि "अरे सख्खा काका गेला ना तुझा?? सुतकात काय लग्न करतोस??"] पण जे जे होइल ते ते पाहाणे आणि ब्लोग लिहिणे हेच जिवित कार्य असल्याने नाइलाज आहे हो....
असो... अश्यारीतीने ही साठां उत्तरांची कहाणी, पाचां उत्तरी सुफ़ळ संपूर्ण.. (एकदाची..)!!!

ता. क.: आता परत ही वाहीनी राहुल-भगीनी संभावना सेठ हिच्या स्वयंवराचा प्रस्ताव घेऊन येत आहे.. (कली मातला आहे, असं आमची आज्जी म्हणायची....)
असो.... Just wait n (don't) watch!!!

सोमवार, ८ फेब्रुवारी, २०१०

तो... माझा सखा...!!!

काल पुन्हा तसंच झालं... सुर्यास्ताची वेळ.... समुद्रकिनार्‍यावर निश्चल बसलेली मी.....
आणि अचानक झेपावून आला तो माझ्याकडे.... आकंठ भिजवून टाकलं त्याने मला स्वत:च्या त्या आवेगात....
क्षणभर सुचलंच नाही मला काही आणि जेव्हा जाणवलं काय झालं तेव्हा अनिर्बंध बरसत होता तो माझ्या सर्वांगावर....
माझी मी अशी उरलीचं नव्हते.... सगळीकडे फक्त तोच, तोच आणि तोच....
माझा एकांत ही माझा राहिला नाही, माझं अस्तित्वही नाही.... सगळं सगळं व्यापून उरला तो....
सगळं काही नितळ, निर्मळ करत राहिला.... त्याच्या त्या रुपाप्रमाणेच....
आणि मी अनिमिष डोळ्यांनी पहात राहिले.... त्याच्याकडे....
डोळ्यातले पाणी पण पुसायचे भान न राहून.... माझे अश्रू पण सामावून घेतले त्याने स्वतःमध्ये....
किती कमी वेळा मिळतो हा बेधुंद क्षण त्याच्यासोबतचा.... त्याच्यासाठीचा.... तरसत असते मी ज्यासाठी....
आमची ही भेट पाहुन समुद्रदेखील उधाणलेला असतो आनंदाने.... माझ्या सख्ख्या मित्रासारखा....
पाहिलेली असते त्याने मी केलेली प्रतिक्षा त्याच्याच साक्षीने.... त्याची धीर गंभीर गाज ऐकू येत असते फक्त....
आता तर संध्याप्रकाशानेदेखील आवरता घेतलेला असतो आपला खेळ....
तो, मी आणि शांत कातरवेळ....
पण आज यावेळी ऊरभर दाटणारी हुरहुर नसते....
कारण माझ्या सख्याच्या बाहुपाशात तिला स्थानच नसते....
हळूहळू अंधाराचा पडदा उलगडत जातो माझ्या सर्वांगावर.... हवाहवासा वाटतो त्याच्यासोबतचा तो एकांत....
पण वेळ झालेली असते त्याच्या परतण्याची....
"आज नको ना जाऊ...." पुटपुटते मी त्याच्या कानात....
'पण ते शक्य नाही राणी....' ही अगतिकता जाणवते मला त्याच्या स्पर्शात....
क्षण क्षण, निमिष निमिष दूर होत जातो तो माझ्यापासून....
त्याला थोपवण्याचा माझा प्रयत्न पडतो तोकडा....
आणि पुन्हा मी उरते एकटी.... समुद्रकिनार्यावर.... पण आनंदात न्हाऊन निघालेली....
तॄप्त.... पुन्हा त्याच्या येण्याची आस धरलेली....

-स्वाती....